१५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा

47

कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील तसंच दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झाले असतील अशा प्रवाशांना १५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली.

सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असं आवाहनही त्यांनी केलं.

स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसंच उपनगरी रेल्वे स्थानकांमधून छायाचित्रयुक्त पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासवर क्यू आर कोड असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.