वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

45

हनुमान हा सर्वशक्‍तीमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्‍त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणूनही प्रसिद्ध आहे. भाव, भक्ती, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असे जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हनुमान.

जन्म कथा – पूर्वी पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. काही शापामुळे ती वानरी रूपाला पावली होती. तिचे नाव अंजना असे होते. ती एकदा मनुष्यरूप धारण करून उत्तम वस्त्रे आणि अलंकार धारण करून पर्वताग्रावर फिरत होती. त्या वेळी मरुत् दैवताने तिचे वस्त्र उडवले. तिचे सुंदर अवयव त्याच्या दृष्टीस पडले. तो मोहित झाला आणि त्याने तिला आलिंगन दिले. ती घाबरून म्हणाली, एकपत्नीव्रतम् इदं को नाशयितुम् इच्छति । म्हणजे माझे हे पातीव्रत्य कोण नष्ट करत आहे ? – (संदर्भ : वाल्मीकी रामायण, कांड ४, सर्ग ६५, श्‍लोक १६) त्यावर मरुत् म्हणतो, मी तुझे पातिव्रत्य भंग करत नाही. भिऊ नकोस ! मी मनानेच तुला आलिंगन दिले आहे. मरुत् दैवताने सांगितले, तुला वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी असा पुत्र होईल. पुढे अंजनीस तसाच पुत्र झाला.

मारुतीमधील प्रकट शक्ती इतर देवांच्या तुलनेत अतिशय जास्त आहे, त्यामुळे मारुतीची उपासना केल्याने मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी लोकांची धारणा आहे. मारुतीमध्ये असलेल्या अधिक प्रकट शक्तीमुळे अनेक कारणांसाठी लोक मारूतीची उपासना करतात,

मारुतीला शेंदूर, रुईची पाने-फुले वहाणे – ज्या वस्तूंमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात.

फुले वाहण्याची पद्धत – हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे हनुमानाचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत.

मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्‍ती अन् कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो. काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात. नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्‍त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये. त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

मारुतीला प्रदक्षिणा घालणे – हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना करा – हनुमान हा सर्वशक्‍तीमान असल्यानेच त्याला भूत, पिशाच, राक्षस, समंध इत्यादी कोणत्याही अनिष्ट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते हनुमानाला काही करू शकले नाहीत. अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी केलेली हनुमानाची उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते. व्यक्‍तीला अनिष्ट शक्‍तींचा त्रास असल्यास तो दूर होण्यासाठी तिला हनुमानाच्या देवळात नेणे, तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्‍तीने हनुमानाला वहाणे, त्रास असणार्‍या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे, तिला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगणे, तिला हनुमानाचा नामजप करण्यास सांगणे, यांसारखे उपाय करता येतात.

बलोपासना करून हनुमंताची कृपा संपादा !– धर्म-अधर्म यांच्या लढ्यातील महत्त्वाचे दैवत म्हणजे हनुमंत ! हनुमंताने त्रेतायुगात रावणाविरुद्धच्या युद्धात प्रभु श्रीरामास सहकार्य केले, तर द्वापरयुगात महाभारताच्या घनघोर युद्धात तो कृष्णार्जुनाच्या रथावर विराजमान होता. हिंदुस्थानात मोगली सत्ता अत्याचाराचे थैमान घालत होत्या, त्या वेळी महाराष्ट्रात बलोपासना रुजवण्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी हनुमंताच्या मूर्तींची ११ ठिकाणी स्थापना केली आणि हिंदूंमध्ये ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले.

पंचमुखी हनुमान – एकदा पाच मुख असलेला एक भयानक राक्षस प्रकट झाला. त्याने कठोर तपश्‍चर्या करून त्याच्यासारखे रूप असणाराच त्याचा वध करू शकेल, असे ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले. वरदान मिळताच तो राक्षस उन्मत्त होऊन सर्वांना भयंकर त्रास देऊ लागला. आम्हाला त्रासातून मुक्त करावे, अशी सर्व देवतांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवंताने दिलेल्या आज्ञेनुसार मंगळवार, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला पुष्य नक्षत्रात सिंह लग्न असतांना हनुमंताने पंचमुखी अवतार धारण केला. त्यांची वानर, नृसिंह, गरुड, अश्‍व आणि वराह अशी पाच सुंदर मुखे होती. पंचमुखी हनुमान राक्षसाजवळ गेला आणि त्याने त्याचा वध केला.

भाविकांनो, स्वतःमध्ये भाववृद्धी होण्यासाठी
आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःकडून झालेल्या धर्मद्रोहाचे पापक्षालन करण्यासाठी हनुमंताने केलेल्या पराक्रमांचे स्मरण करा !

संदर्भ – सनातन निर्मित ग्रंथ मारुती तसेच सनातन संस्था संकेतस्थळ.