छत्रपती संभाजीनगर – संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाअभावी विहिरी आटल्या आहेत, तर पिके करपली आहेत आणि लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण झाले आहे.

मराठवाड्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ‘ऐन पावसाळ्यात अशी स्थिती असल्यामुळे पुढे कसे होणार ?’ याची चिंता नागरिकांना आहे.

पैठण तालुक्यातील अंतरवली गावात पाणी नसल्याने काही लोक अंघोळच करत नाहीत, एवढी परिस्थिती गंभीर झाली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण म्हणून ओळख असलेले जायकवाडी धरण ज्या पैठण तालुक्यात आहे, तेथेच पाण्याची स्थिती बिकट आहे.