नैसर्गिक आपत्ती होते तेव्हा त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. हवामानासबंधी नैसर्गिक आपत्तींमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वन्य अग्नी, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि शीतलहरी यांचा समावेश आहे, नैसर्गिक आपत्ती या अनिश्चित असतात.

नैसर्गिक आपत्तीत धोकादायक घटना घडतात की, ज्यात मालमत्ता व वस्तूंचे नुकसान तसेच जीवितहानी व मनुष्यहानी होऊन जनजीवन विस्कळीत होते.

कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगररांगांमुळे कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होते. त्यामुळे कोकणाला मोठया प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना ही करावा लागतो. कोकण विभागात एकूण 7 जिल्हे असून 50 तालुके आणि 6 हजार 353 गावे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे सरासरी 2 हजार ते 3 हजार 368 मि.मी. पाऊस हा कोकणात पडतो. विशेषत: मुंबई व ठाणे जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस आणि भरतीची वेळ एकच असल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोकण विभागात गेल्या सहा वर्षात सरासरी 2 हजार 701.40 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 371 पूरप्रवण व 223 दरडग्रस्त गावे आहेत.

कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3 हजार 200 कोटी रुपये विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळात आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. राज्यभरातील 20 पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये एकूण 7 हजार 900 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

असे असताना दरडप्रवण क्षेत्रात न मोडणाऱ्या रायगड जिल्हयातील इशाळगड येथे परवा दि.19 जुलै 2023 रोजी रात्रीच्या वेळी इशाळगडाच्या पोटात वसलेल्या आणि कलावंतीण दुर्गाच्या शेजारी असलेल्या प्रसिध्द ट्रेकर्स पॉईंट असलेल्या इशाळवाडीवर बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. शांत निजलेल्या इशाळवाडीत अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि सारा महाराष्ट्र हादरुन गेला.

रायगड जिल्हयातील माथेरान आणि आसपासच्या परिसरात गेल्या तीन- चार दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुसळधार पावसामुळे इशाळवाडीतील 48 पैकी 17 घरे गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास वीस घरांचे गंभीर नुकसान झाल असून उर्वरीत दहा घरे वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक अवघ्या तासभरातच घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदारात वाऱ्यामुळे बचाव पथकांची निसर्गाने जणू परीक्षच घेतली. पाऊसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यत पोहचण्यास बचाव पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी घटनास्थळी तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरु करण्यास अडचणी उद्भवल्या.

अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी असल्याने मदतीसाठी कोणतेही यांत्रिकी साधने आणणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त माणसाच्या मदतीने येथे मदत पोहाचविणे शक्य होते.

एनडीआरएफ , एसडीआरएफ, टिडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रत्यक्ष मदतकार्यास सुरुवात झाली. या शिवाय ट्रकेर्स ग्रुप, स्वंयसेवी संस्था, देखील मदतीसाठी सरसावल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड ते दोन तास पायी दगडधोंडयाचा निसरडा चिखलमय निसरडा रस्ता तुडवत प्रसंगी प्रतिकुल परिस्थितीत मुख्यमंत्री श्री. शिंदे इशाळगडावर पोहचले. वाटेत दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांशी आस्थेवाईकपणे चौकशी करत जणू त्यांचे दु:खअश्रू पुसण्याचे काम ते करत होते. एवढयावर न थांबता वेळप्रसंगी हवाई मदतीसाठी सूचना देत अन्न, पाणी, निवाराची सोय आहे की नाही याची जातीणं पाहणी करत होते.

या त्यांच्या तत्परतेमुळे अनेक जाणते अजाणते हातामध्ये हत्तीच बळ संचारले होते. यात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन वहाने तातडीने रवाना करण्यात आल्या. तात्पुरते राहण्यासाठी सोय व्हावी यासाठी आठ कंटेनर देखील पाठविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून रायगड जिल्याहयातील उद्योग व संस्था देखील पुढे आल्या आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य, घटनास्थळाकडे पाठविण्यात येत होते. यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेस कॅम्पकडे 20 X 10 आकाराचे चार कंटेनर पाठविण्यात येत आहेत. 40 X 10चे दोन कंटेनर पाठविण्यात आल्या आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी , रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्ल्यू समूह येथून रवाना झाले आहे. घटनास्थळ उंचावर असल्याने मशिनरी साहित्य पोहोचत नसल्याने दरड कोसळून निर्माण झालेले मातीचे ढिगाऱ्या करण्यासाठी दूर करण्यासाठी पनवेल येथून एैशी अनुभवी कारागिराचे पथक औजारासह दाखल झाले आहेत. येथील विद्युतपुरवठा सुरळीत सुरु होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता , महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदत साहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पा़ड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकीय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे.

या दुर्घटनेत मदत कार्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पथकामार्फत गुरुवारी 11 शेळ्या व 10 गोवर्गीय जनांवरावर उपचार करण्यात आले. तसेच या ठिकाणी एकूण 3 बैल व एक शेळी मृत आढळून आलेली असून, त्यांचे फोटो व पंचनामे करण्यात आले आहे. या पथकांमार्फत जखमी पशुधनास उपचार करणे, मृत पशुधनाचे फोटो व पंचनामे करणे, शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे व जखमी पशुधनास खाद्याचे नियोजन करणे इत्यादी कामे करण्यात आली.

एकूणच काय तर जेव्हा एखादी आपत्ती उद्भवते तेव्हा त्या घटनेमागे अनेक कारणे असतात. परंतू दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी अनेक जाणते अजाणते हात तेथे सिंहाचा वाटा उचलत असतात. हे काम करत असतांना मदतकर्त्याना अनेक संकटाना तोंड देत अहोरात्र मदतीचा ओघ सुरु असतो.