मराठी, हिंदी, तसेच भारतातील जवळपास सर्वच भाषांतील बालगीतांत ज्या चंद्राचा उल्लेख येतो, त्या चंद्राचे आकर्षण भारतियांना नेहमीच राहिले आहे. या चंद्रावर जाण्यासाठी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ म्हणजेच ‘इस्रो’ सज्ज झाली असून १४ जुलैला ‘चंद्रयान-३’ (CHANDRAYAAN-3) (CHANDRAYAAN-3 Launch) दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी अवकाशात झेपावलेले असेल ! आजपर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे ३ देश चंद्रावर पोचले आहेत; मात्र इस्रोच्या म्हणण्यानुसार ‘चंद्रयान’ चंद्राच्या अशा भागावर उतरणार आहे, जिथे आजपर्यंत कुणी पोचू शकलेले नाही.’ वर्ष १९८४ मध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी रशियाच्या अंतराळ यानातून पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर प्रवेश केला. तेव्हापासून प्रत्येक भारतियाने ‘भारतानेही चंद्रावर पाऊल ठेवावे’ हे स्वप्न पाहिले. ते स्वप्न आता साकार होत आहे. अत्यंत अल्प मूल्यात आणि अधिकाधिक स्वदेशी तंत्रज्ञान वापरून भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी जागतिक स्तरावर भारताची मान निश्चितच उंचावणारी आहे !
 
                
