News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

लंडन (ब्रिटन) – आर्क्टिक महासागरातील बर्फ अनुमानापेक्षा अधिक गतीने वितळत आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार आर्क्टिक महासागरातील सर्वच बर्फ वर्ष २०३० चा उन्हाळा येता-येता वितळेल, म्हणजे तोपर्यंत तो पूर्णपणे नाहीसा होईल. या अभ्यासात वर्ष १९७९ ते वर्ष २०१९ या ४० वर्षांचे आकडे, उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रे आणि हवामानाचे विश्‍लेषण करून असे सांगण्यात आले की, आर्क्टिकचा बर्फ अनुमानापेक्षा वेगाने वितळत आहे. ‘आर्क्टिकचा बर्फ म्हणजे पृथ्वीची प्रतिकारशक्ती’ असे मानले जाते. त्यामुळे तेथील बर्फ नष्ट झाल्यावर संपूर्ण नैसर्गिक व्यवस्था बिघडेल.

वर्ष २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणाशी संबंधित एका अभ्यास गटानने सांगितले होते की, आर्क्टिकचे तापमान इतर जगाच्या तुलनेत चार पट गतीने वाढत आहे. गेल्या ४० वर्षांत, उन्हाळ्यानंतर राहिलेला बहुस्तरीय बर्फ ७० लाख चौरस किमीवरून ४० लाख चौरस किमी इतका अल्प झाला आहे. हा भूभाग भारताच्या क्षेत्रफळाइतका आहे.



२. हॅम्बर्ग विद्यापिठातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’चे प्रा. डर्क नॉट्झ म्हणाले, ‘‘हिमवर्षाव प्रत्येक दशकात १२.६ टक्क्यांच्या दराने अल्प होत आहे. पृथ्वीची प्रतिकारशक्ती सशक्त करणारे आर्क्टिक बर्फाचे आवरण नष्ट झाले, तर त्याचा संपूर्ण जगावर हवामान, मानव आणि परिसंस्था या तीन पातळ्यांवर गंभीर परिणाम होईल.’’

आर्क्टिकचा बर्फ नष्ट झाल्याचे हे होणार परिणाम !
महासागरातील जलस्तर वाढेल : जागतिक समुद्राची पातळी प्रतिवर्षी ४.५ मिलीमीटरने वाढत आहे. आर्क्टिक बर्फ वितळल्याने ती आणखी वेगाने वाढणार !
सागरी प्रवाह आणि मोसमी पाऊस (मान्सून) प्रभावित होणार !
उष्णतेच्या लाटा, जंगलातील आगी, पूर अशा तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये वाढ होणार !
आर्क्टिकचा बर्फ नाहीसा झाल्याने पृथ्वीचे तापमान का वाढणार ?
आर्क्टिकवर पडणारी बहुतेक सूर्यकिरणे बर्फाने परावर्तित होऊन आकाशात परत जातात. बर्फ नसल्यामुळे ही प्रक्रियाच संपुष्टात येईल. त्यामुळे साहजिकच पृथ्वीचे तापमान वाढेल.

आग्नेय आशियात २०० वर्षांत सर्वाधिक उष्णता !
आग्नेय आशियातील अनेक भाग २०० वर्षांतील सर्वाधिक उष्णता सहन करत आहेत. व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये मे मासाचे सरासरी तापमान ३२ अंश सेल्सिअस असते; परंतु सध्या ते ४० अंशांपुढे गेले आहे. तेथे ४६.४ अंश सेल्सिअस तापमानही नोंदवले गेले आहे. कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह येथे ४२.१ अंश, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये ४३.७ अंश, तर मलेशियाची राजधानी क्वालालंपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Image by <a href=”https://pixabay.com/users/makabera-6773476/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=6779681″>Markus Kammermann</a> from <a href=”https://pixabay.com//?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=6779681″>Pixabay</a>