
नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. इंदिरानगरसह सिन्नर तालुक्यातील काही भागांत सकाळच्या सुमारास हलक्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकरी आणि नागरिकांची धावपळ झाली. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसाठी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा यासारख्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.