१५ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘विजयादशमी (दसरा)’ आहे. त्या निमित्ताने…

65

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २१

अर्थ : श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच अन्य लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो.

सामान्य लोकांच्या या मानसिकतेचा विचार करूनच आपल्याकडे सणांची रचना केली आहे. विजयादशमी हा लोकोत्तर पुरुषांचा किंवा देवांचा विजयी पराक्रम स्मरून त्याचे अनुकरण करण्याचा दिवस ! ९ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर विजयादशमीला श्री दुर्गादेवीने महिषासुरावर विजय मिळवला. प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा पराभव याच दिवशी केला. अज्ञातवासानंतर पांडवांनी शमी वृक्षावरून त्यांची शस्त्रे काढली, तो हाच दिवस ! भारतीय संस्कृती ही मानवतेची आणि शौर्याची पूजक आहे. मानवतेचा नाश करू पहाणार्‍या आसुरी वृत्तीची नव्हे ! राक्षसी वृत्तींपासून मानवाचे आणि मानवतेचे रक्षण करायचे असेल, तर व्यक्ती-व्यक्तीत शौर्य, वीरता, पराक्रम जागले पाहिजेत. नवरात्राचा जागर हा त्यासाठीच असतो. या शौर्याचा उत-मात येऊ नये; म्हणून त्याला देवीच्या भक्तीची आणि वात्सल्याची जोड दिली आहे. तथापि आज हा हेतू विसरून आपल्या सर्वच उत्सवांचे आपण ‘इव्हेंट्स’ (कार्यक्रम) करू लागलो आहोत. त्यात शौर्य-धैर्याचा मूळ हेतू हरवला जातो आहे. सध्या केवळ नाच, गाणी आणि गरबा यातच आम्ही रमून आणि दमून गेलो आहोत ! भगवंताची गाणी गाणे, नृत्य करणे, मोठ्याने त्याच्या नावाचा गजर करणे, हे सर्व मान्य आहे; पण देहभान हरपून भक्तीत तल्लीन झाल्यावरच ! हिडीस नाच, मोठ्या कर्कश आवाजात डीजे लावून आणि अपेयपान करून नव्हे !

प्रत्येक सणामागील आध्यात्मिक हेतू लक्षात घ्या !

दीपावलीच्या तोंडावरच विजयादशमी येते. आपल्या प्रत्येक सणामागे काही हेतू आणि त्यात संदेश आहे. आपण तो विसरत चाललो आहोत. यामुळे हानी आपलीच होणार आहे, हे ध्यानात घ्यायला नको का ? परब्रह्म अथवा परमात्मा हा सगुण साकारात दिसणारा नव्हे. तो कळण्यासाठी आत्मसाक्षात्काराचा दिव्यानुभवच हवा. एखादा अप्रतिम सूर ऐकतांना आपण जशी तल्लीनता अनुभवतो, तसेच काहीसे आत्मसाक्षात्कारात होते. आपण उपासनेसाठी मूर्तीपूजा स्वीकारली आहे. ज्या समाजात मूर्तीपूजा नाही, ते सदैव अस्वस्थच असलेले दिसतात. मूर्तीमुळे आपण निर्गुण निराकाराला सगुण साकारात बघतो. हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे की, आपण मूर्तीपूजेत अडकत नाही; कारण ही पूजा परब्रह्माची आहे, याची आपल्याला शिकवण असते. मूर्ती कितीही असल्या, तरी ‘सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।’ म्हणजे ‘कुठल्याही देवाला नमस्कार केल्यास अंततः तो भगवान श्रीकृष्णालाच पोचतो’, हे आपल्याला ठाऊक असायला हवे. त्याला जे अर्पण करतो, ते खरेतर त्याचेच असते. मी अमके दिले, तमके द्रव्य दिले, हा अहंकार कशाला ? तो ईश्वरार्पण केला की झाले ! हे समजून घ्यायला हवे. मीपणा सोडून ईश्वराला शरण जाणे, हीच खरी पूजा आहे.

प्रतिवर्षी दसर्‍याला आपट्याचे एक झाड लावा !

आता पाने तोडली, तरी एक-दोन मासांनी त्याला पुन्हा पालवी फुटेल; पण दसर्‍याच्या दिवशी पाने वाटण्याची पद्धत बंद केली, तर मात्र हे झाड १० ते १२ वर्षांत मात्र नक्कीच नष्ट होईल. ज्या लोकांना वाटते की, एखाद्या झाडाची पाने तोडल्यावर झाड नष्ट होईल, मुळात ते लोक आपले वनस्पती शास्त्राविषयीचे अज्ञान प्रकट करत असतात. झाडाची जोपासना करतांना बर्‍याच वेळा झाडाची काही पाने अथवा फांद्या छाटाव्याच लागतात; त्यामुळे ते झाड नव्या जोमाने बहरते; पण या लोकांचा कोणत्याच विषयाचा अभ्यास नसल्याने आणि केवळ हिंदु सण अन् धर्म यांना विरोध करायचा असल्याने असे संदेश पसरवले जातात. पर्यावरणाची काळजी असेल, तर त्यांनी झाडे लावावीत. त्यांना कुणी अडवतही नाही; पण अशा परंपरा नष्ट करू नका. ज्या लोकांना खरोखरंच पर्यावरणाची आणि आपट्याच्या झाडाची काळजी आहे, त्यांनी या वर्षीपासून नवीन उपक्रम राबवावा अन् प्रतिवर्षी दसर्‍याला एक आपट्याचे झाड स्वतः लावावे. असा सकारात्मक विचार सर्वांनी करून आपले सणोत्सव साजरे केले, तर खरोखरंच सणांच्या आनंदाला तोटा रहाणार नाही.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, २५.१०.२०२०)

संदर्भ – दै. सनातन प्रभात