केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पांतर्गत ९७० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे या दिवशी येथे केले. हवन, पूजन यांसाह धार्मिक विधींद्वारे नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कर्नाटकातील प्रसिद्ध शृंगेरी मठाच्या पुजार्‍यांनी वैदिक मंत्रांचा उच्चार केला. यासह गणपति होमही करण्यात आला. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.

या वेळी मंत्रोच्चारांच्या सात्त्विक स्वरांत तामिळनाडूतील शैव पुरोहितांच्या हस्ते पंतप्रधानांनी ‘सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक’ असलेला ऐतिहासिक ‘सेंगोल’चा, म्हणजेच ‘राजदंडा’चा स्वीकार केला. या वेळी पंतप्रधानांनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर हा राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला.

राजदंड अर्थात ‘सेंगोल’
भारतातील राजदंडाचा इतिहास प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो. राजदंडाला तमिळ भाषेत ‘सेंगोल’ म्हटले जाते. याचा अर्थ ‘सत्याला साथ देणारे’, असा आहे. राजदंडाचा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्याने केला होता.

मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावर त्यांचा अधिकार दर्शवण्यासाठी राजदंडाचा वापर केला. गुप्त साम्राज्य, चोल साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य यांनीदेखील राजदंड वापरला होता. ब्रिटिशांनी भारतियांना सत्तेचे हस्तांतरण करतांना तमिळनाडू येथून राजदंड बनवून घेतला होता. वर्ष १९४७ मध्ये ब्रिटिशांनी हा राजदंड भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्याला उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आले होते. राजदंड ज्यांच्याकडे सुपुर्द करण्यात येते, त्यांच्याकडून न्यायाची आणि निष्पक्षपाती सरकारची अपेक्षा केली जाते.

नवीन संसद भवन १४० कोटी भारतियांच्या आकांक्षा आणि स्वप्न यांचे प्रतिबिंब ! – पंतप्रधान मोदी
नवे संसद भवन ही केवळ एक इमारत नाही, तर १४० कोटी भारतियांच्या आकांक्षा आणि स्वप्न यांचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे, जे जगाला भारताच्या निर्धाराचा संदेश देते. संसदेची ही नवीन इमारत भारताच्या विकासाची हाक देईल. लोकसभेत पवित्र सेंगोलची स्थापनाही करण्यात आली आहे. चोल साम्राज्यात राजदंड हा कर्तव्य आणि सेवा प्रतीक मानले जात होते. आपण या पवित्र राजदंडाची प्रतिष्ठा परत मिळवू शकलो, हे भाग्य आहे. जेव्हा संसदेच्या कार्यवाहीस प्रारंभ होईल, तेव्हा हा राजदंड सर्वांना प्रेरणा देत राहील.