नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल ! – शिवराजसिंह चौहान

3

सातारा, २८ फेब्रुवारी – राहुल गांधी देशभरात अनेक यात्रा काढत आहेत. या यात्रेद्वारे ते देश जोडण्याची भाषा करत आहेत. प्रत्यक्षात काँग्रेसने देश तोडण्याचे पाप केले आहे. सगळा इतिहास चुकीचा सांगितला आहे. खरा इतिहास पुसून टाकला आहेत. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर पालट झाले आहेत. भविष्यात मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.

येथील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, ‘‘देशावर सत्ता मिळवण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी देशाची फाळणी केली. काँग्रेसच्या सत्ता काळात फार मोठे घोटाळे झाले. काँग्रेसच्या काळात भारताला जगात कुठेही स्थान नव्हते. घोटाळ्यांचा देश म्हणून भारताला हिणवले जात होते; मात्र भाजप सत्तेवर आल्यावर सर्व चित्र पालटले आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद नक्षलवादाचा बिमोड केला आहे. चीनला जशास तसे उत्तर दिले आहे. अयोध्या येथे श्रीराममंदिर बांधण्याची घोषणाही केली आणि २२ जानेवारीला ती पूर्णही केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शक्तिशाली भारताची निर्मिती होत आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही.’’