न्यूयॉर्क (अमेरिका) – सध्याच्या जगात इंटरनेट हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक झाले आहे. भारताचा विचार केला, तरी किमान ८० कोटी भारतीय इंटरनेटचा वापर करतात. असे असले, तरी वर्ष २०२५ मध्ये इंटरनेटची संपूर्ण यंत्रणाच नष्ट होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या काळात पृथ्वीवर एक विनाशकारी सौर वादळ आदळू शकते, ज्याच्यामुळे जगभरातील इंटरनेट नादुरुस्त होऊ शकते. या प्रकाराला ‘इंटरनेट अ‍ॅपोकॅलिप्स’ अशा संज्ञेने संबोधिले गेले आहे.

सौर वादळांमध्ये ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स’ म्हणजेच विद्युत्चुंबकीय कंपने असतात. यांची तीव्रता अधिक असेल, तर त्यांचा पृथ्वीवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशेनिक अँड एटमॉस्फिअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या प्रवक्त्याने सांगितले की, अंतराळातील मोसमी वादळांच्या लहरींची वारंवारतेचा अभ्यास करण्यासाठी सूर्याच्या सौर वादळांकडे लक्ष ठेवले जाते. यांतून वादळांच्या लहरींच्या वारंवारतेचा एक अंदाज बांधता येतो. सौर वादळामुळे ‘रेडिओ ब्लॅकआऊट’ होऊन इंटरनेट बंद पडू शकते.

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सांगितले की, वर्ष १७५५ पासून सौर वादळांची निरीक्षणे नोंदवून ठेवण्यास आरंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत २५ वेळा सौर वादळे झाली आहेत. नासाने ‘वर्ष २०२५ मधील सौर वादळामुळे इंटरनेट धोक्यात येईल’, यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

कॅलिफोर्नियाच्या ‘यूनिव्हर्सिटी ऑफ कंप्यूटर सायंस’च्या प्राध्यापिका संगीता अब्दु ज्योती यांचे म्हणणे आहे की, यंदाचे सौर वादळ हे गतीमान असेल. त्यातच संपूर्ण जग इंटरनेटवर अवलंबून झाले आहे. या वादळाचा इंटरनेटवर किती प्रमाणात परिणाम होईल, हे आतातरी सांगता येणे कठीण आहे !