मद्य दुकाने चालू करणे समाजासाठी हितकारक !

76

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची मद्य दुकानांवरून सरकारवर उपहासात्मक टीका

नृसिंहवाडी – उपाहारगृहे, मद्याची दुकाने, चित्रपटगृह चालू आहेत; मात्र मंदिरे, शाळा बंद आहेत. मद्याची दुकाने चालू करणे समाजासाठी हितकारक असून या राज्यकर्त्यांना कोरोनामध्ये जनतेची काळजी फारच वाटत आहे, अशी उपहासात्मक टीका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केली. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाची भीती निर्माण केली गेली आहे. विलगीकरणाच्या नावाखाली एकमेकाला एकमेकांपासून दूर ठेवले. आजपर्यंत जे मृत्यू झाले आहेत ते कोरोनापेक्षा भीतीमुळेच झाले. शेकडो वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर वारी चालू आहे. ती परकीयांनीसुद्धा बंद केली नाही. जे जे समाजाला घातक आहे ते या सरकारने चालू केले; मात्र सद्भावना व्यक्त करणारी मंदिरे बंद केली हे कशाचे द्योतक आहे ? कोरोनामुळे बहुसंख्य लोक मरणार आहेत, अशी भीती सरकार निर्माण करत आहे.’’

संदर्भ – दै. सनातन प्रभात