चेन्नई | प्रतिनिधी — राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या यशाचा गौरव करताना सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान भारताने फक्त २८ मिनिटांत पाकिस्तानच्या आत ९ ते १० लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. हे यश भारताच्या अत्याधुनिक स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानामुळे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
आयआयटी मद्रासच्या ६२व्या पदवीप्रदान समारंभात बोलताना डोभाल म्हणाले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, एकत्रित हवाई नियंत्रण प्रणाली आणि आधुनिक रडार्ससारख्या उपकरणांनी भारतीय लष्कराला मोठी ताकद दिली.
“ही हजार वर्षांत एकदाच मिळणारी संधी आहे. त्यामुळे देशाचे भविष्य घडवण्यासाठी युवकांनी पुढे यावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न मांडले आणि युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन आणि दुर्मिळ खनिजांचा वापर करून नवे शोध लावावेत, असे सांगितले.
डोभाल यांनी सांगितले की, भारताच्या भौगोलिक स्थितीमुळे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कनेक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते. तसेच भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ताकदही टिकवता येईल.
द्वितीय महायुद्धादरम्यान जर्मन कोड फोडणाऱ्या एका तंत्रज्ञाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना ‘तंत्रज्ञान योद्धा’ बनण्याचे आवाहन केले. “देशाच्या गरजा अनेक आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी युवकांनी समर्पण आणि कर्तव्यभावनेने काम केले पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.









