नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरचं हे त्यांचं पहिलं राष्ट्रीय भाषण असल्याने देशभरात मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या चार दिवसांपासून चाललेल्या तीव्र संघर्षानंतर दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने सर्व सैन्य कारवाया तात्काळ थांबवण्याचा करार केला आहे. या युद्धविरामाच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांचं हे भाषण होत असून, यामध्ये शांततेच्या प्रक्रियेतील पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांचं हे भाषण देशातील सुरक्षा परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आगामी धोरणांवर प्रकाश टाकणारे ठरू शकते. विशेषतः ऑपरेशन सिंदूर संदर्भात आणि भारत-पाकिस्तान संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे भाषण महत्त्वाचं मानलं जात आहे.
देशभरातील नागरिक, राजकीय विश्लेषक, संरक्षण तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष या भाषणावर केंद्रीत झालं आहे.