नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २४ मे अखेर १६.३७ टक्के साठा आहे. पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा १६ टक्के कमीच झाला होता. त्यात आता उन्हाळ्यात हा साठा १६.३७ टक्के झाला आहे.
मे महिना आता संपायला आला आहे. जूनमध्ये पाऊस लवकर आला तर पाण्याचा प्रश्न थोडा सुटेल. पण, जूनमध्ये सगळीकडे पाऊस होत नाही. त्यामुळे तीव्र पाणी टंचाईचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा २८.१० टक्के तर समुहात २२.०९ टक्के साठा आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे.
