News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक : देशातील महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेभोवती पुन्हा एकदा वादाचे सावट निर्माण झाले आहे. यंदाची परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती; मात्र परीक्षेचा प्रश्नसंच नाशिकमधून ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लीक झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

या आरोपांमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, परिस्थिती गंभीर असल्याने परीक्षा पुन्हा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कथित ‘नीट पेपरफुटी प्रकरणात’ पोलिसांनी एका ३० वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान या नेटवर्कमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

यंदाच्या NEET परीक्षेसाठी देशभरातून सुमारे २२ लाख विद्यार्थी उपस्थित होते, तर त्यापैकी जवळपास अडीच लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, तपासात आणखी एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे. सुमारे १२ ते १५ महिन्यांपूर्वी एक संभाव्य प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याची माहिती मिळाली आहे. ही प्रश्नपत्रिका तब्बल १५० पानांची असून त्यात ४१० प्रश्नांचा समावेश होता, असे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, या प्रश्नांपैकी रसायनशास्त्र विषयातील सुमारे १२० प्रश्न हे प्रत्यक्ष ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नांशी साधर्म्य असलेले असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी या बाबीची गंभीर दखल घेतली आहे.

अधिक माहितीनुसार, कथित फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर ही माहिती हरियाणापर्यंत पोहोचली आणि पुढे तिचे १० वेगवेगळे संच तयार करण्यात आले, अशी माहिती समोर येत आहे.

तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, हा कथित प्रश्नसंच बिहार, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्येही पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून, देशव्यापी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता तपासली जात आहे.

सध्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये या घटनेमुळे संभ्रमाचे वातावरण असून, संबंधित अधिकृत संस्थांकडून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.