दिवाळी मधील महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्दशी, ह्या दिवसांचे दिवाळीतील महत्व जाणून घेऊया.
लक्ष्मीपूजन – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
सण साजरा करण्याची पद्धत –

प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात. ‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.
जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे.’
माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो. तेव्हा तोही भागीदार आहे. मी वर्षभरात काय मिळविले आणि त्याचा विनियोग कसा केला, त्याच्या पै पै चा हिशोब या जमा-खर्चाच्या वहीत नमूद केला आहे. तो आज तपासणीसाठी तुझ्यासमोर ठेवला आहे. तू साक्षी आहेस. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. तू माझ्याजवळ आल्यापासून मी तुझा मानच राखला आहे. तुझा विनियोग प्रभूकार्यासाठीच केला आहे; कारण त्यात प्रभूचाही वाटा आहे. हे लक्ष्मीदेवी, तू निष्कलंक आणि स्वच्छ अशी आहेस, त्यामुळे मी तुझा उपयोग वाईट कामात कधीही केला नाही.
हे सर्व मला श्री सरस्वतीदेवीने केलेल्या साहाय्यामुळेच शक्य झाले. तिने माझा विवेक कधीही ढळू दिला नाही. त्यामुळेच माझे आत्मबल कमी झालेे नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधान लाभले. हा खर्च मी प्रभूचे स्मरण ठेवूनच केला. (स्मरणाद्वारे) त्याला सहभागी करून घेतले असल्यामुळेच त्याचेही सहकार्य लाभले आहे. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. माझ्या नजरेस काही चूक आल्यास मी ती पुढे होऊ देणार नाही. तेव्हा हे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या.
आध्यात्मिक महत्त्व : अशाप्रकारे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते. त्यामुळे धनामुळे निर्माण होणारा उन्माद त्याच्यात निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता येते.
नरकचतुर्दशी –

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि करण्यात येणार्या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.
सण साजरा करण्याची पद्धत – आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात. यमतर्पण – अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.
संदर्भ व अधिक माहिती : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’