मुंबई – महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सायबर फसवणूक प्रकरणांचा जलद तपास सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात ५० सायबर पोलीस ठाण्यांची स्थापना केली आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांवर प्रभावीपणे लगाम बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्यातील जिल्हा व आयुक्तालय स्तरावर सायबर प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असून, त्यामध्ये अत्याधुनिक उपकरणांसह प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प जागतिक स्तरावरील एक क्रांतिकारी उपक्रम मानला जात आहे.
२०२४ मध्ये नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांची माहिती:
1. जानेवारी ते डिसेंबर २०२४ दरम्यान, महाराष्ट्र सायबर कार्यालयात ३,३२,५३८ तक्रारी प्राप्त झाल्या.
2. यातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एकूण ४४०.३७ कोटी रुपये वाचवण्यात यश मिळाले.
3. cybercrime.gov.in संकेतस्थळावर तसेच टोल-फ्री क्रमांक १९३० वर नागरिक तात्काळ तक्रार नोंदवू शकतात.
4. राज्यात आतापर्यंत १,९३६ गुन्हे उघडकीस आले असून, १,९६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
5. पुढील ५ वर्षांत ५,००० पोलिसांना सायबर गुन्हे तपास व प्रतिबंधात्मक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्यात सायबर सुरक्षेसाठी सुरू झालेली ही मोहीम नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र, अटक झालेल्या आरोपींवर काय कठोर कारवाई करण्यात आली, हे देखील पारदर्शकपणे नागरिकांसमोर आणले पाहिजे. फक्त अटक पुरेशी नाही, तर दोषींना शिक्षा होणे देखील तितकेच आवश्यक आहे, तरच या उपक्रमाला खरी धार मिळेल.