मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ‘जनतेशी सुसंवाद’

7

मुंबई दि. ७ – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

केव्हा आणि कुठे होईल संवाद
बुधवार दि 10 मे रोजी महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर गुरूवार दि 11 मे रोजी ‘डी वॉर्ड’ मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पालकमंत्री श्री. केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे.