महाशिवरात्र – महत्व व व्रत कसे करावे.

42

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे ? – भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्चलोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे.

`शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिव-तत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिव-तत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिव-तत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही’. – ब्रह्मतत्त्व (संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ )

व्रत कसे कराल ? – महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत – काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा !

  • दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
  • शिवपिंडीला अभिषेक करा.
  • पांढ-या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
  • भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
  • महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.
  • शिवपिंडीवर अभिषेक करा ! – भगवान शिवाला शक्यतो दुधाचा अभिषेक करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो. दूध हे शक्तीचे प्रतीक असल्याने त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो, हे त्यामागचे अध्यात्मशास्त्र आहे. असे केल्याने त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो.
  • शिवपिंडीला हळद-कुंकू ऐवजी भस्म लावा ! – हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये. कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात. भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.
  • पांढर्‍या अक्षता वहा ! – अक्षतांकडे (धुतलेले अखंड तांदूळ) निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता वहा.
  • शिवाला पांढरी फुले वहा ! – शाळुंकेला निशिगंधा, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ शिवपिंडीकडे करून वहावीत.
  • शिवाला बेल वहा ! – शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर  शिव संतुष्ट होतो. बेलाची पाने तारक शिव-तत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे शिवाला बेल वाहातांना तो उपडा वाहावा. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

असे घ्या शिवपिंडीचे दर्शन !

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.

शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्‍हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्‍हणजे सोमाच्‍या दिशेकडे मंदिराच्‍या विस्‍ताराच्‍या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्‍हणजे नाला जातो, त्‍याला सोमसूत्र म्‍हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

भगवान शिव संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ग्रंथ खरेदी करा !
Sanatanshop.com