
नवी दिल्ली – पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर संदेश देत चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जल करार स्थगित करणे. भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, “जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादाला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत हा करार लागू होणार नाही.”
मात्र, प्रश्न असा आहे की, सिंधू जल करार रद्द करणे आणि पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवणे खरोखरच इतके सोपे आहे का? एका रात्रीतच नद्यांचे प्रवाह थांबवता येतील का?
एका रात्रीत नद्यांचे पाणी थांबवणे शक्य नाही
भारताने सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्या भारताकडे ते पाणी रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. जर अचानक पाणी थांबवले तर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भीषण पूर येण्याची शक्यता आहे.
पाणी थांबवण्यासाठी किती वेळ लागेल?
सध्या भारताने ३ नद्यांवर चार प्रकल्पांची योजना आखली आहे. त्यापैकी बागलिहार धरण (चिनाब नदीवर) आणि किशनगंगा प्रकल्प (झेलमच्या उपनदीवर) कार्यरत आहेत, तर रॅटले प्रकल्प आणि पाकल दुल प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात आहेत.
यामुळे सर्व पाणी रोखण्यासाठी भारताला आणखी काही वर्षे लागू शकतात. पाकिस्तानचे तज्ञही मान्य करतात की, भारत एका रात्रीत सिंधू जल करारांतर्गत मिळणारे पाणी थांबवू शकत नाही, त्यामुळे पाकिस्तानकडे भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्यासाठी वेळ असेल.
पाण्याअभावी पाकिस्तानची शेती आणि वीज संकटात
पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब प्रांतांतील सुमारे ९० टक्के शेती सिंधू जल करारांतर्गत मिळणार्या पाण्यावर अवलंबून आहे. जर भारताने पाणी थांबवले, तर पाकिस्तानमध्ये शेती कोरडी पडेल, पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होईल आणि वीज निर्मितीवरही मोठा परिणाम होईल. परिणामी, पाकिस्तानला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.