भारतियांनी मोदी यांची विचारधारा नाकारल्याचे पाकचे माजी मंत्री फवाद चौधरी यांचे मत
इस्लामाबाद – लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला फटका बसल्याने पाकिस्तान आनंदी झाला आहे. पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारमधील तत्कालीन मंत्री फवाद चौधरी यांनी वर्ष २०१९ च्या तुलनेत भाजपच्या जागा अल्प झाल्याविषयी आनंद व्यक्त केला आहे. भारतातील जनतेने नरेंद्र मोदी आणि त्यांची विचारधारा यांना नाकारले आहे, असे फवाद म्हणाले.
फवाद चौधरी यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानप्रमाणेच भारतातही मोदी चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. पाकिस्तानी लोकांना राहुल यांना पंतप्रधान म्हणून पहायचे आहे; कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल बहुसंख्यवादाकडे होत आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यापैकी जो कुणी नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल, त्यांना आपण पाठिंबा द्यायला हवा. नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याचे आवाहन चौधरी यांनी भारतातील जनतेला वारंवार केले होते.