Image of Bhagwan Parashurama holding his axe (Parashu) with a divine aura in the background, symbolizing strength and righteousness.
Image of Bhagwan Parashurama holding his axe (Parashu) with a divine aura in the background, symbolizing strength and righteousness.

भगवान विष्णूंचे सहावे अवतार असलेले परशुराम यांची जयंती वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी केली जाते. या पवित्र दिवशी, भक्त भगवान परशुरामांची भक्तीभावाने पूजा करतात. या वर्षी परशुराम जयंती २९ एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे.

भगवान परशुराम ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते आणि त्यांनी धरणी या देवी लक्ष्मीच्या अवताराशी विवाह केला होता. त्यांनी दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि पृथ्वीवर धर्माचे संरक्षण करण्यासाठी जन्म घेतला होता. परशुराम यांना ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही वंशाचा वारसदार मानले जाते, म्हणूनच त्यांना ‘ब्रह्मक्षत्रिय’ असेही म्हणतात.

चला जाणून घेऊया भगवान परशुराम यांच्याबद्दल काही विशेष आणि कमी ज्ञात गोष्टी

अमरत्व प्राप्त केलेले भगवान परशुराम

परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते. भगवान परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार असून ते ऋषी जमदग्नी व रेणुकेचे पुत्र होते. ते ‘सप्त चिरंजीवी’ंपैकी एक आहेत, म्हणजेच त्यांनी अमरत्व प्राप्त केले आहे. त्यांच्या कथा भक्ती, शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहेत. परशुरामांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून ‘परशु’ (कुडाळ) आणि अमरत्वाचे वरदान मिळवले. भगवान शंकरांनी त्यांना युद्धकला आणि शापविद्या शिकवली.

श्रीविष्णूचा सहावा अवतार

सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगु यांच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुकामाता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार घेतला. ‘महर्षि जमदग्नी यांच्या धर्मपत्नी रेणुका यांना चार मुलांनंतर पुन्हा दिवस राहिले. भगवान विष्णूंनी आपल्या सर्व अंशांनी रेणुकेच्या उदरी प्रवेश केला. त्यामुळे रेणुका अतुल तेजस्वी दिसत होती. पूर्ण दिवस भरल्यावर त्रेतायुगाच्या संधीकालांत वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीयेला, पुनर्वसु नक्षत्रावर रेणुकेला मुलगा झाला. सर्वत्र आनंदोत्सव झाला. त्याचे नाव ‘राम’ ठेवण्यात आले. जमदग्नीचा सर्वांत धाकटा मुलगा राम ! रामात सूर्यतेज होते. भार्गवगोत्री असल्याने त्यास भार्गवराम असेही संबोधले जात असे.

जमदग्नीने मोठ्या थाटाने रामाचे सर्व द्विजसंस्कार पार पाडले. राम व्रतबंधाला योग्य झाल्यावर जमदग्नीने त्याचे उपनयन करण्याचे ठरवले. अनेक ऋषीश्रेष्ठ, राजे-महाराजे यांना निमंत्रण दिले. मोठ्या थाटाने रामाचे मौंजीबंधन झाले. उपनयनानंतर राम पित्याची अनुज्ञा घेऊन अध्ययनाकरता कश्यपमुनींच्या आश्रमी गुरुगृही गेला. अमित तेजस्वी रामाकडे पाहून कश्यपांना आनंद झाला. त्यांनी रामाचा शिष्य म्हणून स्वीकार केला. राम विष्णूचाच अवतार. त्याच्या जिव्हेवर साक्षात् सरस्वतीच वास करत होती. लवकरच राम सर्व विद्यांत पारंगत झाला. वेद आणि सर्व शास्त्रांचे त्याचे अध्ययन पूर्ण झाले.

ज्ञानासाठी दत्तात्रेयांचा शोध

परशुरामांनी अधिक ज्ञानासाठी गंधमादन पर्वतावर जाऊन भगवान दत्तात्रेय यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यांनी संसाराच्या बंधनांपासून मुक्ती साधली आणि वैराग्याचे महत्व समजावले.

रामाचे नाव ‘परशुराम’ होणे

पुढे तो कैलासावर तपश्‍चर्येस गेला. गणपतीची आराधना करून त्याने गणपतीस प्रसन्न करून घेतले. गणेशाकडून रामाने ‘परशूविद्या’ मिळवली. गणपतीने रामास दिव्य ‘परशू’ दिला. त्या दिव्य परशूचे तेज अग्नीशिखेसारखे होते. त्याची धार अखंडित होती. गती अकुंठित होती. दिव्य परशू मिळाल्यामुळे भार्गवरामास ‘परशुराम’ म्हणू लागले.

अमित शक्तिशाली परशुराम घरी येण्यास निघाले. वाटेत त्यांना घनदाट अरण्य लागले. कीर्र झाडीतून हिंस्त्र श्‍वापदांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. अकस्मात् परशुरामाने दीनवाणीने आक्रंदन करणार्‍या मनुष्याचा आवाज ऐकला. त्या आक्रोशाच्या दिशेने ते रोखून पाहू लागले. त्या वेळी वाघाने एका तरुणास पकडल्याचे त्यांना दिसले. तात्काळ परशुरामाने स्वतःचे धनुष्य सिद्ध केले आणि बाणाने त्या व्याघ्राचा वेध घेतला. परशुरामाच्या बाणाने क्षणार्धात त्या वाघास लोळवले आणि त्या तरुणाची सुटका झाली. त्याचा पुनर्जन्म झाला. त्या तरुणाचे नाव ‘अकृतव्रण’. तो शांताऋषांचा पुत्र. अकृतव्रण परशुरामाचा एकनिष्ठ आणि अनन्य शिष्य झाला.’

भीष्म व परशुराम यांच्यातील युद्ध

महाभारतात सांगितले आहे की, परशुरामांनी भीष्माला राजकन्या अम्बेशी विवाह करण्यास सांगितले होते. पण भीष्माने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत विवाहास नकार दिला. त्यामुळे परशुराम संतप्त झाले आणि दोघांमध्ये २३ दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी नारदमुनींनी हस्तक्षेप करून पृथ्वीच्या रक्षणासाठी युद्ध थांबवले.

तपस्वी जीवनाची निवड

वैदिक युगाच्या शेवटी झालेल्या रक्तपाताने कंटाळून परशुरामांनी आपली शस्त्रे समुद्रात टाकली आणि संन्यासी जीवन स्वीकारले. ‘कल्कि पुराणा’नुसार, ते कलियुगाच्या शेवटी परत येतील आणि कल्कीचे मार्गदर्शन करतील.

काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केलेले दैवत !

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील लोटे गावातील महेंद्र पर्वतावर भगवान परशुरामाचे पुरातन मंदिर आहे. तेथे परशुरामाचे पदचिन्ह उमटलेल्या शिळेचे नित्यपूजन होते. या शिळेच्या मागे तीन मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मध्यभागी भगवान परशुरामाची आकाराने मोठी आणि रेखीव मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे काळदेवता आणि डावीकडे कामदेवता यांच्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत. भार्गवरामाने काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केल्याचे त्या द्योतक आहेत.

अपराजेय योद्धा असलेल्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा विनाश करण्यासाठी परशुरामाने केलेला अद्वितीय पराक्रम !

हैैहय वंशातील अधर्मी राजा महिष्मती नरेश कार्तवीर्य सहस्रार्जुनाने सहस्रो वर्षे कठोर तपश्‍चर्या करून भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि असीम बलशाली बनून सहस्रो भुजा धारण करण्याचे वरदान प्राप्त केले होते. अशा कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा नाश करता यावा, यासाठी त्याच्या तपोबलापेक्षा अधिक तपोबल अर्जित करण्यासाठी परशुरामाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्‍चर्या केली. कार्तविर्याचे तपोबल परास्त करण्यासाठी परशुरामाने त्याहून कठोर तपश्‍चर्या करून ब्राह्मतेजाच्या शस्त्राने कार्तविर्याच्या पुण्यबळावर एकप्रकारे प्रहार करून त्याला क्षीण केले. त्यामुळे कार्तविर्याच्या सहस्रावधी भुजांद्वारे कार्यरत असणार्‍या सूक्ष्म कर्मेंद्रियांची दिव्य शक्ती निष्प्रभ होऊ लागली आणि अधर्माचे प्रतीक असणार्‍या कार्तविर्याच्या पराभवाचा सूक्ष्मातून आरंभ झाला. कार्तविर्याला पराभूत करण्यासाठी भगवान परशुरामाने दिलेला हा आध्यात्मिक स्तरावरील लढा अद्वितीय आहे.

कार्तवीर्य सहस्रार्जुनाने ऋषी दांपत्याच्या विरोधाला न जुमानता जमदग्नी आश्रमातून कामधेनूला बलपूर्वक स्वतःसमवेत नेऊन गोमातेचे अपहरण केले. ही घटना घडली, त्या वेळी परशुराम आश्रमात नव्हता. तो घनघोर अरण्यात कठोर तपश्‍चर्या करण्यात मग्न होता. जेव्हा तो जमदग्नींच्या आश्रमात पोचला, तेव्हा त्याला घडलेला प्रकार समजला. कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या कह्यात असणार्‍या कामधेनूची मुक्तता करून गोमाता आणि गोधन यांचे संरक्षण करण्यासाठी त्याने गोधन चोरणार्‍यांचा विनाश होवो, असा संकल्प केला. त्याची शापवाणी खरी ठरली; कारण गोधन चोरल्याचा अपराध केल्यामुळे कार्तविर्याचा पुण्यक्षय झाला. जमदग्नीऋषींवर प्राणघातक आक्रमण केल्यामुळे कार्तविर्याच्या पुत्रांनाही पातक लागले. परशुरामाने कार्तविर्याच्या कुळाचा विनाश करण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास नेऊन गोमातेची मुक्तता करून तिला पुन्हा जमदग्नींच्या आश्रमात आदराने आणले.

कार्तवीर्य सहस्रार्जुनाचा पुण्यक्षय झाल्याने त्याचा आध्यात्मिक स्तरावर सपशेल पराभव झाल्यामुळे स्थुलातून त्याचा विनाश काळ समीप आला. त्याच्या अंतःकाळ जवळ येताच भगवान परशुरामाने सहस्रार्जुनावर स्थुलातून परशूने वार करून त्याच्या सहस्र भुजा छाटून टाकल्या आणि नंतर त्याचा शिरच्छेद केला. अशा प्रकारे भगवान परशुरामाने क्षत्रियांचे निर्दालन करण्यासाठी परशूचा शस्त्र म्हणून वापर करण्यास आरंभ केला.

भगवान परशुरामाने केलेले अपूर्व अवतारी कार्य आणि पराक्रम यांची ठळक उदाहरणे

२१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय करणे

भगवान परशुरामाने एकट्याने संपूर्ण पृथ्वीला २१ वेळा प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर माजलेल्या अहंकारी आणि अधर्मी क्षत्रियांचा निःपात केला. अशा प्रकारे पृथ्वी प्रदक्षिणा घालून त्याने पृथ्वीचा भार हलका केला आणि त्याचसमवेत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचे परम पुण्यही प्राप्त केले.

सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य असणे

प्रजेचा छळ करून संपूर्ण पृथ्वीवर उपद्रव माजवणार्‍या क्षत्रियांची संख्या सहस्रो होती. त्यांच्याजवळ लक्षावधी अक्षौहिणी सैन्यबळ होते. भगवान परशुराम हा नरदेह धारण केलेला साक्षात् श्रीमन्नारायणच होता. त्यामुळे त्याच्यात सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य होते.

दानशूर

एकछत्र सम्राटाप्रमाणे अखिल भूमीचा अधिपती असूनही अश्‍वमेध यज्ञाच्या वेळी परशुरामाने यज्ञाचे अध्वर्यू महर्षि कश्यप यांना संपूर्ण पृथ्वीचे दान दिले. यावरून परशुराम किती दानशूर होता, हे दिसून येते.

नवसृष्टीची निर्मिती करणे

भगवान परशुरामाने अवघ्या तीन पावलांत समुद्र मागे हटवून क्षणार्धात परशुराम भूमीची निर्मिती केली आणि चितेतून चित्तपावन ब्राह्मणांची निर्मिती करून परशुराम क्षेत्रात नवीन सृष्टीच साकार केली.

संपूर्ण अवतार काळात सर्वाधिक क्षात्रोपासना केल्याचे एकमेव उदाहरण

गुरुकुलाची परंपरा, आश्रम व्यवस्था आणि ऋषी जीवन यांना क्षत्रियांच्या उन्मत्तपणाने ग्रासून टाकले होते. क्षत्रियांच्या जाचातून परंपरा, संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे भगवान परशुरामाने शिष्यावस्था संपताच शिवाने आशीर्वाद स्वरूप दिलेल्या परशु, धनुष्यबाण आणि शापमय वाणी यांचा शत्रूवर वार करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करून कार्तवीर्य सहस्रार्जुनासह सर्व उन्मत्त क्षत्रियांचा निःपात केला. संपूर्ण अवतार काळात सर्वाधिक क्षात्रोपासना केल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे भगवान परशुराम होय.

source – sanatan sanstha website – sanatan.org